महामार्गावरील हॉटेल थांब्यांना सरनाईक यांची भेट   

पुणे: परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक पंढरपूर दौर्‍यावर असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांना अचानक भेट दिली. तेथील प्रवासी व एसटी कर्मचार्‍यांशी संवाद साधला त्यांना मिळणारे अन्नपदार्थ ताजे आहेत का, अन्नपदार्थ वाजवी दरात मिळतात का, तसेच महामंडळाची नाश्ता योजना चालू आहे का याची चौकशी केली. याबरोबरच तेथील प्रसाधनगृहाची देखील त्यांनी आवर्जून पाहणी केली.
 
यावेळी महिला प्रवाशांनी प्रसाधनगृहाच्या अस्वच्छते बाबत तक्रार नोंदवली. त्याची तातडीने दखल घेत मंत्री सरनाईक यांनी सदर प्रसाधनगृहे तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित हॉटेल मालकाला दिले. तसेच  आढळलेल्या इतर त्रुटी बाबत संबंधित मालकाला  विहीत वेळेत त्या दूर करण्याचे निर्देश दिले. अन्यथा सदर हॉटेल थांबा नाईलाजाने रद्द करण्याचे निर्देश देऊ, असे सांगितले. दरम्यान हे हॉटेल थांबे ज्या पुणे विभागात येतात त्या विभाग नियंत्रक यांना संपर्क साधून या हॉटेल थांब्यांच्या त्रुटीची पूर्तता पुढील एक महिन्यात करण्याचे निर्देश दिले.

अनधिकृत हॉटेल थांब्यावर बस थांबवणार्‍या चालक-वाहकांवर कारवाई

दरम्यान भिगवण जवळील एका अनधिकृत हॉटेल थांब्यावर एसटी च्या अनेक बसेस थांबलेल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तेथे भेट देऊन पाहणी केले असता, अत्यंत अस्वच्छ वातावरणात प्रवाशांना जेवण वाढले जात असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधितांवर कडक कारवाई करावी. असे एसटीच्या अधिकार्‍यांना निर्देश दिले.

स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात   

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई-बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वास परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. 
 
स्मार्ट ई-बस सादरीकरण प्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणार्‍या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई- बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ई-बसेस देखील ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणार्‍या कंपनीला आम्ही सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे सादरीकरण करण्यात आले. नव्याने घेण्यात येणार्‍या या स्मार्ट ई-बसेससाठी विविध  उत्पादकांकडून स्पर्धात्मक सादरीकरण मागविण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील सरनाईक यांनी दिली.
 
नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचाली वर लक्ष ठेवणारे ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.बस चालवताना जर चालक जांभळ्या देत असेल, त्याची डुलकी लागत असेल, झोप येत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई-बसेस मध्ये असणार आहे. 
 
महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये असावी, असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले.

भिगवणला लवकरच नवे बसस्थानक

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक हे पंढरपूर दौर्‍यावर असताना महामार्गावरील भिगवन बसस्थानकाला त्यांनी भेट दिली. तेथील असुविधा बाबत स्थानिक रहिवाशांनी  मंत्री सरनाईक यांच्या कडे कैफियत मांडली. महामार्गामुळे सदर बसस्थानक सखल भागात गेल्याने पावसाळ्यात पाणी साचून अत्यंत गैरसोय होते. येथील सध्या वापरात असलेले प्रसाधनगृहे देखील अत्यंत अस्वच्छ असतात, अशा तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली. याबाबत महामंडळाच्या बांधकाम विभागाचे महाव्यवस्थापक दिनेश  महाजन यांच्याशी  दूरध्वनीवरून संवाद साधून नव्या प्रशस्त भिगवन बसस्थानकाची निविदा  लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्यामुळे भिगवन येथे नवे बस स्थानक लवकरच आकाराला येईल, असा आशावाद येथील रहिवाशांच्या मध्ये निर्माण झाला आहे.
 

Related Articles